पाण्याबद्दल एक FB वर पोस्ट वाचण्यात आली. ५३ दिवस काही गावामध्ये सरकारी नळाला पाणी येत नाही. मनमाड मध्ये नेहमीच पाणी २०-२५ दिवसांनी येत. आणि जर आधि आला तर उलट तिथल्या लोकांना कटकट वाटते. पाणी भरायचे काम वाढते म्हणून.
Bureau of Standards, IS:1172-1993, प्रमाणे प्रत्येक माणसाला रोज २०० लिटर पाणी आवश्यक आहे. जर हे खरं मानलं आणि घरात अगदी ४-५ माणसं जरी धरली तरी २०० x ५=१००० लिटर पाणी आवश्यक. आणि जर ५३ दिवसाचा पणीसाठा म्हणजे ५३००० लिटर पाणी साठवायला हवे. इतके पाणी साठवण्याची सोय प्रत्येक घरात असते?
अर्थात मला इतके आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. माझी सगळी शालेय वर्ष इचलकरंजी मध्ये गेली. इचलकरंजी हे जरी पश्चिम महाराष्ट्रातले गाव असले तरीसुद्धा उन्हाळ्यात पाण्याचे प्रचंड हाल असायचे. म्हणजे अजूनही असतातच. आठवड्यातून एकदा पाणी येते. ते पण पाण्याचा वार ठरलेला नाही. वेळ ठरलेली नाही. मग अंदाजाने या आठवड्यात गुरुवारी पाणी आले म्हणजे पुढच्या आठवड्यात बुधवार पासून शुक्रवार रात्री पर्यंत कधीही येईल असा आपणच अंदाज बांधायचा(बहुधा तो येतो बरोबर.) पण मग बुधवार सकाळ पासून ते पाणी येईपर्यंत पुढच्या आठवड्यात home arrest. कोणीतरी एकाने घरी थांबायचं. एरवी उन्हाळा सोडून पण २ दिवसांनी पाणी येते. तेव्हा पण तेच. नक्की कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळेला पाणी येणार याची काहीही खात्री नाही. आपणंच अंदाज बांधायचा. बहुदा तो बरोबर येतो. आणि त्या दिवशी त्या वेळेला घरी थांबायचे. पण जर अंदाज बरोबर आला नाही तर मग ४ दिवसांनी पाणी मिळणार आणि उन्हाळ्यात तर १५ दिवसांनी. अर्थात ४ दिवस जरी पाणी आले नाही तरी सगळं व्यवस्थित चालेल इतका पाण्याचा साठा आमच्याकडे असतोच. त्याला पर्याय नाही. २००० लिटर ची टाकी वापरायला आणि पिण्यासाठी वेगळा साठा असा सगळा मामला. तरी उन्हाळ्यात प्रश्न येतोच. त्यात कोणी पाहुणे आले तर मग विचारायलाच नको. पाणी येणाऱ्या दिवशी बाहेर कुठेही जायचे नाही. पाणी आल्यावर पाण्याच्या टाक्या तर भरायच्याच. पण बादल्या, हंडे, तांबे, पातेली,साटेली, कुंडे,गाडगी,मडकी,घागरी अगदी फुलपात्री सुद्धा सगळी भरून घ्यायची . अंघोळी spl. नाहणे उरकून घ्यायचे घरातल्या होतील तितक्या जणांचे. शक्य असेल तर कामवालीला बोलावून घेऊन तेव्हाच धुणं, भांडी,फारशी असे सगळे उरकून घायचे. झाडांना पाणी घालायचे. हे आजही चालू असते. २०१७ मध्ये सुद्धा.
No comments:
Post a Comment